इनरकॉन कंपनीच्या पवनऊर्जा प्रकल्पामुळे भीमाशंकर
वन्यजीव अभयारण्याला निर्माण झालेला धोका
३३१४३. श्री. सुधीर मुनगंटीवार (बल्लारपूर), श्री. नानाजी सिताराम शामकुळे (चंद्रपूर), श्री. अतुल देशकर (ब्रम्हपुरी), श्री. देवेंद्र फडणवीस (नागपूर, दक्षिण-पश्चिम), श्री. नानाभाऊ पटोले (साकोली), श्री. संजय राठोड (दिग्रस) : सन्माननीय वने मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) इनरकॉन कंपनीच्या पवनऊर्जा प्रकल्पामुळे भीमाशंकर वन्यजीव अभयारण्याला धोका निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय;
(२) असल्यास, कोणत्याही राष्ट्रीय किंवा संरक्षित वनाच्या हद्दीपासून १० कि.मी. अंतरावर वृक्षतोड करण्यास बंदी असतानासुद्धा या परिसरात सदर प्रकल्पाकरिता वृक्षतोड सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे, हेही खरे आहे काय;
(३) असल्यास, याबाबत चौकशी करून त्या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ;
(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?
डॉ. पतंगराव कदम : (१) हे खरे नाही.
(२) हे खरे नाही, सदर प्रकल्पाकरिता केंद्र शासनाने मंजूर केलेल्या वनक्षेत्रात फक्त जुन्नर वनविभागाचे अखत्यारितील मौजे वांद्रे या गावचे वनक्षेत्र भिमाशंकर वन्यजीव अभयारण्यापासून सुमारे ३.५ कि.मी. आहे. संरक्षित क्षेत्रापासून १० कि.मी. सीमेच्या आतील वृक्ष कटाई संदर्भात मा. मुंबई उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांचेकडील सिव्हिल ॲप्लिकेशन ७३५०/२००५ च्या ७ जून २००६ च्या आदेशानुसार कार्यवाही होणे क्रमप्राप्त आहे. या आदेशानुसार प्रकल्प यंत्रणेस त्यांचा प्रकल्प कार्यान्वित करावयाचा असेल तर त्यांनी त्यांचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावा. सदर प्रस्तावाची तपासणी करून त्यास वनसंवर्धन अधिनियम, १९८० चे कलम २ अन्वये केंद्र शासनास अनुमती देता येईल. त्यानुसार प्रकल्प यंत्रणेने त्यांचा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला व त्यास केंद्र शासनाने त्यांचेकडील पत्र क्र. 8-14/2009-FC, Dated 10th December 2009 अन्वये मंजुरी दिली आहे. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे दाखल केलेली रिट याचिका क्र. ५१९/२०१० इनरकॉन (इंडिया) लि. विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेवर मा. न्यायालयाने ३ मार्च २०१० रोजीच्या निर्णयाने सदर प्रकल्पास त्यांचे काम कार्यान्वित करणेस अनुमती दिली आहे.