पुणे जिल्ह्यातील एमआयडीसी परिसरातील विविध कंपन्यातून सोडण्यात येणार्या रसायन
मिश्रीत पाण्यामुळे शेतीक्षेत्र नापिक होण्याची निर्माण झालेली शक्यता.
३५०५९. श्री. गिरीष बापट (कसबा पेठ), श्रीमती माधुरी सतिश मिसाळ (पर्वती), श्री. संजय विश्वनाथ भेगडे (मावळ), श्रीमती पंकजा गोपीनाथराव मुंडे-पालवे (परळी), श्री. एकनाथराव गणपतराव खडसे (पाटील) (मुक्ताईनगर), श्री. सुधाकर संग्राम भालेराव (उदगीर), श्री. अशोक रावसाहेब पवार (शिरुर), श्री. रमेशराव किसन थोरात (दौंड), श्री. राम शंकर शिंदे (कर्जत जामखेड), श्री. विलास लांडे (भोसरी), श्री. दिलीप मोहिते (खेड-आळंदी), श्री. बापुसाहेब तुकाराम पठारे (वडगांव शेरी), श्री. जितेंद्र सतिश आव्हाड (मुंब्रा-कळवा) : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :--
(१) पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात ढोंकसांगवी, कोरेगाव, फलकेमळा, निमगाव भोगी, सोनेसांगवी व रांजणगाव गणपतीच्या काही परिसरात विविध कंपन्यातून सोडलेली रसायन मिश्रीत दूषित पाणी पसरल्याने सुमारे १००० ते १२०० एकर शेतीक्षेत्र नापिक होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे दिनांक १ जानेवारी २०११ रोजी निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय ,
(२) असल्यास, ढोंकसांगवी परिसरातील सुमारे ७ विहिरींमध्ये हे रसायनमिश्रीत पाणी उतरल्याने पाण्यावर तेलकट तवंग व लालसर रंग आल्याने ७०० ते ८०० कुटुंबांना पाण्याचा वापर करता येत नसल्याचेही निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय ;
(३) असल्यास, उक्त प्रकरणी ज्या शेतकर्यांचे रसायन मिश्रीत पाण्यामुळे नुकसान झाले त्या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे काय ;
(४) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व तद्नुषंगाने कोणती कार्यवाही करण्यात आली व येत आहे ?
श्री. नारायण राणे : (१) रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी, सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे वाहून नेण्यासाठी उभारण्यात आलेल्या टाकीला जोडलेला पाणी उपसा करणारा पंप बंद पडल्यामुळे टाकीतील सांडपाणी जवळच्या नाल्यामध्ये वाहून गेले. औद्योगिक वसाहती नजिकच्या शेतामधील एका विहिरीमध्ये काही प्रमाणात सांडपाणी झिरपून गेल्याचे दिनांक ३१ डिसेंबर २०१० रोजी निदर्शनास आले.
(२), (३) व (४) विहिरीतील व नाल्यातील पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळा व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडून तपासण्यात आले आहेत. हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असून शेतीसाठी वापरण्यायोग्य असल्याने तपासणीतून दिसून आले. त्यामुळे शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच या परिसरातील ढोकसांगवी, कोरेगाव व रांजणगाव या गावांना महामंडळामार्फत
५/३
अल्पदरात शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांची पाणीपुरवठ्याबाबत गैरसोय झालेली नाही. प्रश्न भाग (१) मध्ये नमूद केलेली उर्वरित गावे औद्योगिक वसाहतीपासून दूरवर आहेत. सदर घटनेचा पंचनामा तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी, ग्रामस्थ व महामंडळाचे प्रतिनिधी यांच्या समक्ष दिनांक ३१ डिसेंबर २०१० रोजी करण्यात आला आहे.
औद्योगिक वसाहतीतील सांडपाण्याच्या टाकीचा बंद पडलेला पंप महामंडळाद्वारे तातडीने दुरुस्त करण्यात आला व सांडपाण्याची गळती थांबविण्यात आली.